
बॉस्को कॉलेज, मुंबई यांच्या NSS कडून कशिवली येथे सात दिवसीय निवासी शिबिराचे यशस्वी आयोजन.जव्हार
माझं गाव माझं शहर वृत्तसेवा .
प्रतिनिधी जव्हार मनोज कांमडी
-डॉन बॉस्को कॉलेज, मुंबई (मुंबई विद्यापीठ संलग्न, NSS युनिट कोड C-26) यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे दि. २ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जव्हार तालुक्यातील दत्तक गाव कशिवली येथे सात दिवसीय निवासी NSS शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या शिबिरात एकूण ७२ NSS स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वयंसेवकांचे निवासस्थान बॉस्को सेवा विकास संस्थान कॅम्पस, वाळवंडा, पालघर येथे होते. शिबिराचे आयोजन व अंमलबजावणी डॉ. यशेष राणपुरा आणि ॲड. चिराग चंदन, NSS कार्यक्रम अधिकारी, डॉन बॉस्को कॉलेज यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.शिबिरादरम्यान काशिवली गावात विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय व कौशल्यविकासात्मक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये कागदी पिशव्या तयार करून त्यांचे वितरण, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण व संवर्धन, जिल्हा परिषद शाळा व आदिवासी शाळांमध्ये अध्यापन, वारली चित्रकला प्रशिक्षण तसेच ग्राम सर्वेक्षणाचा समावेश होता.यासोबतच पाणी संवर्धन, प्लास्टिकविरोधी जनजागृती, पर्यावरण संरक्षण, मोबाईलचा गैरवापर व सायबर गुन्हे, अंधश्रद्धा, मानसिक आरोग्य आणि बालमजुरी यांसारख्या सामाजिक-आर्थिक विषयांवर प्रभावी पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. वंचित व मागासवर्गीय मुलांसाठी मूल्यशिक्षण व व्यक्तिमत्व विकासाचे उपक्रमही राबविण्यात आले.शिबिराच्या प्रत्येक दिवशी सकाळी योग व ध्यान सत्र, तसेच हसण्याची थेरपी (Laughter Therapy) घेण्यात आली. गाव व शाळा सुशोभीकरण तसेच भित्तीचित्र रंगकामामुळे परिसर अधिक आकर्षक करण्यात आला.शिबिरात विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. रॉयल डी’सूझा यांनी मूल्ये व नीतिमत्ता, मनोज कामडी यांनी PESA Act 1996,व ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व अंमलबजावणी, व विशाल शेंडे यांनी वारली चित्रकला, प्रा. अविनाश अडसुळ यांनी जैवविविधता व पर्यावरण संवर्धन, तर अण्णा कडलासकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.या सातदिवसीय NSS शिबिरामुळे स्वयंसेवकांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, सेवाभाव आणि जबाबदारीची भावना विकसित झाली असून काशिवली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी व उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.






